वसमत उपजिल्हा रुग्णालयातील NQAS अंतर्गत झालेल्या विकास कामांच्या चौकशीचे आदेश,७९.९६ लाखांच्या विकासकामांची तांत्रिक,आर्थिक व प्रशासकीय चौकशी करण्याचे वैद्यकीय अधिक्षकांचे सा.बां.उपविभाग वसमत यांना पत्र
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक -गिरीष देशमुख वसमत
वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात NQAS कार्यक्रमांतर्गत मंजुर निधीतुन करण्यात आलेल्या तब्बल ७९ लाख ९६ हजार रुपयांच्या विकासकामांवर आता चौकशीचे सावट आले आहे.या कामांची निष्पक्ष व उच्चस्तरीय तांत्रिक,आर्थिक तसेच प्रशासकीय चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी,अशी मागणी करणारे पत्र उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.जी.व्ही.काळे यांनी दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी वसमत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना दिले आहे. NQAS कार्यक्रमांतर्गत रुग्णालयाच्या विविध विकासकामांसाठी मंजुर झालेल्या निधीच्या वापराबाबत काही मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.या अनुषंगाने संबंधित कामांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय हिंगोली यांच्याकडुनही संबंधित पत्रव्यवहार झाल्याचे वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेसाठी मंजुर करण्यात आलेला निधी नेमका कुठे आणि कशा पद्धतीने खर्च करण्यात आला? संबंधित कामे मंजुर अंदाजपत्रकानुसार करण्यात आली आहेत का? प्रत्यक्ष कामाचा दर्जा समाधानकारक आहे का? तसेच प्रत्यक्ष करण्यात आलेली कामे आणि कागदोपत्री नोंदी यामध्ये काही तफावत आहे का,यांसह विविध प्रश्नांची उत्तरे आता चौकशीतुन समोर येण्याची शक्यता आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी संबंधित निवेदनातील मुद्द्यांची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रकरण पुढे पाठविले आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच आरोग्य विभाग या प्रकरणात कोणती भुमिका घेतो,याकडे वसमतकरांचे लक्ष लागले आहे.वसमत उपजिल्हा रुग्णालयाबाबत यापुर्वीही विविध प्रशासकीय तसेच रुग्णसेवेशी संबंधित प्रश्न चर्चेत आले आहेत.आता NQAS अंतर्गत झालेल्या विकासकामांच्या चौकशीचे आदेश पुढे आल्याने या प्रकरणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.चौकशी झाल्यानंतरच कामांमध्ये प्रत्यक्षात कोणतीही अनियमितता झाली आहे किंवा नाही,हे स्पष्ट होणार आहे.मात्र,जर निधीच्या वापरात अथवा कामांच्या अंमलबजावणीत अनियमितता आढळली,तर त्याची जबाबदारी निश्चित कोणाची? हा सवाल सध्या वसमतकरांकडुन उपस्थित केला जात आहे.चौकशी निष्पक्षपणे होऊन संपुर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर यावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई व्हावी,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.














Add Comment