वसमत प्रतिनिधी
वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी दि.२८ एप्रिल रोजी वसमत शहर पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातून भव्य ‘हेल्मेट रॅली’ काढण्यात आली.हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन आणि अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
सध्या रस्ते अपघातांचे प्रमाण चिंतेचा विषय ठरत असून,अनेक वेळा डोक्याला दुखापत झाल्यामुळे वाहनधारकांना प्राण गमवावे लागतात.ही बाब लक्षात घेऊन वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.शहरातील प्रमुख मार्गावरून ही रॅली काढण्यात आली,ज्यामध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी नागरिकांना कळकळीचे आवाहन केले की,”स्वतःचा जीव मोलाचा आहे,तो वाचवण्यासाठी दुचाकी चालवताना प्रत्येकाने हेल्मेटचा वापर करणे अनिवार्य आहे. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.”
रॅली दरम्यान पोलिसांनी ‘हेल्मेट वापरा-जीव वाचवा’अशे बॅनर दाखवत जनजागृती केली व शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले.या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून,यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षित प्रवासाबाबत जागरूकता निर्माण होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.














Add Comment