जनसंवाद उपक्रमातुन नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य हिंगोलीत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचा नागरिकांशी थेट संवाद
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक:गिरीष देशमुख.वसमत
नागरिकांच्या तक्रारी समजुन घेऊन त्यांचा तातडीने निपटारा करणे तसेच पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद अधिक दृढ करून लोकाभिमुख कामकाजाद्वारे जनतेचा पोलिसांवरील विश्वास वाढविण्याच्या उद्देशाने नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत ‘जनसंवाद’ उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप हे दर महिन्याला परिक्षेत्रातील जिल्हा मुख्यालयांना भेट देऊन जिल्ह्यातील पोलीस कामकाजाचा आढावा घेत आहेत.यावेळी ते संबंधित जिल्ह्यातील तक्रारदारांशी प्रत्यक्ष संवाद साधुन त्यांच्या तक्रारी व अडचणी जाणुन घेत असुन,त्यांचे त्वरित निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
दि.२९ जुन रोजी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मासिक आढावा बैठक झाल्यानंतर दुपारी २.३० ते ४.०० या वेळेत पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी तक्रारदारांशी थेट संवाद साधला.यावेळी एकुण १३ तक्रारदारांनी आपले लेखी अर्ज सादर केले.या अर्जांमध्ये मारहाण,सायबर फसवणुक,दाखल गुन्ह्यांच्या तपासासह विविध प्रकारच्या तक्रारींचा समावेश होता.
प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याबाबत आवश्यक सुचना देण्यात आल्या.
तक्रारदारांकडुन प्राप्त अर्जांच्या जलद निवारणासाठी पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने यापूर्वीच ‘संवेदना’ ही तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे.जनसंवाद उपक्रमादरम्यान प्राप्त झालेले सर्व अर्ज या पोर्टलच्या माध्यमातुन पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात येणार असुन,प्रत्येक तक्रारीवरील कार्यवाहीचा आढावा नांदेड परिक्षेत्र कार्यालयातील फीडबॅक पथकाकडुन घेतला जाणार आहे.
यावेळी हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा,अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना,उपविभागीय पोलीस अधिकारी (वसमत) तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.














Add Comment