आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर माऊलींचा नवा चांदीचा रथ सज्ज,आधुनिक तंत्रज्ञानाची परंपरेला जोड
दिशा न्युज मराठी २४×७,
मुख्य संपादक- गिरीष देशमुख
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेला नवा चांदीचा रथ भक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे.आळंदीजवळील चिंबळी येथे हा रथ तयार करण्यात आला असुन,पारंपरिक रचनेसोबत आधुनिक सुविधांची सांगड घालण्यात आली आहे.
यापुर्वीचा चांदीचा रथ सुमारे अडीच टन वजनाचा असल्याने तो ओढताना बैलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.नव्या रथाचे वजन एक टनाने कमी करून ते दीड टन करण्यात आले आहे.त्यामुळे रथ अधिक सहजपणे ओढता येणार असुन बैलांवरील ताणही कमी होणार आहे.
हा रथ डीआरडीओच्या मार्गदर्शनाखाली आणि अष्टेकर ज्वेलर्स यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे.रथामध्ये अत्याधुनिक बेअरिंग-कपलिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने त्याची हालचाल अधिक सुरळीत होणार आहे.
भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रथावर आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.रथाचे वरचे स्ट्रक्चर फायबरचे असुन त्यावर चांदीचे इलेक्ट्रोप्लेटिंग करण्यात आल्यामुळे रथाला आकर्षक आणि देखणे रूप प्राप्त झाले आहे.
रथाच्या अग्रभागी संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती तसेच सुर्य, गरुड,हनुमान आणि जय-विजय यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.त्यामुळे रथाचे धार्मिक आणि कलात्मक सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
सुमारे २० ते २५ लाख रुपये खर्चुन तयार करण्यात आलेला हा रथ भाविक स्वत,बैल किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने सहज ओढु शकतील.दि. ०८ जुलै रोजी होणाऱ्या प्रस्थान सोहळ्यापुर्वी हा नवा चांदीचा रथ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सेवेत दाखल होणार असुन,यंदाच्या आषाढी वारीचे तो विशेष आकर्षण ठरणार आहे.














Add Comment