वसमत शहरातील अवैध माती उत्खनन,वाहतूक व बेकायदा साठवणुक बाबत वेळोवेळी वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध होऊन सुद्धा कारवाईबाबत महसुल व पोलीस प्रशासनाची उदासिनता.
वसमत / तालुका प्रतिनिधी
वसमत शहरात भल्या पहाटे परभणीकडून येणारे मातीने भरलेले हायवा वाहन सर्व नियम धाब्यावर बसवून वाहतूक करत असल्याचे चित्र रोज पाहायला मिळत आहे.मात्र प्रशासन याकडे केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार?”असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
वरिष्ठांकडून आदेश देण्यात येऊनही पोलीस व महसूल प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचारी हे माती माफियांविरोधात “गांधारीची भूमिका”घेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
वसमत तालुक्यात सुरू असलेल्या अवैध माती उत्खनन,गौण खनिज साठा व बेकायदेशीर वाहतुकीविरोधात अखेर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर“लाक्षणिक उपोषण व ढोल बजाव आंदोलन” करण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले की, “वसमतमध्ये दिवसाढवळ्या माती माफियांचा धुमाकूळ सुरू असुन प्रशासनाचे दुर्लक्ष त्यांना पाठीशी घालत आहे.”
निवेदनानुसार,तालुक्यातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर अवैध माती उत्खनन केले जात असून ती वीटभट्ट्यांवर साठवली जात आहे.रोज शेकडो हायवा व टिप्परद्वारे वाहतूक सुरू असल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असुन अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
“नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे,पण प्रशासन कारवाईऐवजी मौन बाळगत आहे,”असा संतप्त आरोप आंदोलनकर्ते गौतम मारोतराव दिपके व सुमेध श्रीरंग मस्के यांनी केला.
आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.
अवैध माती वाहतूक तात्काळ बंद करावी.
कायमस्वरूपी तपासणी पथक नेमावे.
नियमबाह्य वाहतूक करणाऱ्या हायवावर व हायवामालकावर कठोर कारवाई करावी.
अवैध माती वाहतुक करणाऱ्या हायवांची आरटीओ मार्फेत कागदपत्रांची व वाहणांची तपासणी करावी व दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करावे.
“कारवाई नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू,”असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
आता प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
माती माफिया विरोधात कारवाई बाबत महसुल व पोलीस प्रशासन “गांधारीच्या” भुमिकेत













Add Comment