दि.१५ एप्रिल हिंगोली (जिमाका)
येत्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुठेही बालविवाह होऊ नयेत,यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहून नागरिकांनीही सक्रिय सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी १०९८ या निशुल्क क्रमांकावर कळवावे,माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस महिला व बाल विकास अधिकारी संतोष दरपलवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहूर्तावर बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.बालविवाह रोखण्याची जबाबदारी पोलीस पाटील,सरपंच,शिक्षक यांच्यासह फेटेवाले,हॉटेल चालक,मंगल कार्यालय संचालक,बँडवाले आणि विवाह विधी करणारे भटजी यांच्यावरही असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी किंवा मुलाचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असल्यास तो विवाह बालविवाह समजला जातो.बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ मधील तरतुदीनुसार वयाची पडताळणी शाळेचे अभिलेख,परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखल्यावरून करणे बंधनकारक आहे. वयाचा पुरावा उपलब्ध नसल्यास प्रकरण महिला व बालविकास समितीकडे पाठविणे आवश्यक आहे.
विवाह समारंभात सेवा देणाऱ्या सर्व संबंधितांनी बालविवाह होणार नाही,याची खात्री करावी.अन्यथा संबंधितांचे परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल.तसेच कोणत्याही ठिकाणी बालविवाह झाल्याचे आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतीस विकासकामांसाठी निधी रोखण्यात येईल,असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
शाळांमधील विद्यार्थिनी सलग १० दिवस अनुपस्थित असल्यास मुख्याध्यापकांनी त्वरित महिला व बालविकास विभागाला कळवावे.प्रत्येक विवाहाची नोंद घेणे आवश्यक असून नोंद न झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.बालविवाह प्रतिबंध समितीमार्फत अचानक तपासण्या करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
टीसीवरील जन्मदिनांक व अधिकृत जन्मदाखला हाच ग्राह्य धरला जाईल.आधार कार्ड वयाच्या पुराव्यासाठी ग्राह्य राहणार नाही.धार्मिक स्थळांवरही बालविवाह होऊ नयेत,यासाठी धर्मगुरूंनी विशेष दक्षता घ्यावी,असे आवाहन करण्यात आले.
हिंगोली जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज
जिल्हा प्रशासनाकडून सर्व ग्रामपंचायतींना सूचना देण्यात येत असून परिपत्रके पाठवून जनजागृती करण्यात येत आहे.बसस्थानके,रेल्वे स्थानके व इतर सार्वजनिक ठिकाणीही जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.
बालविवाह रोखायचायं-१०९८ वर कॉल करा.
बालविवाहाची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ १०९८ या हेल्पलाईनवर संपर्क साधावा,असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अक्षय तृतीयेला बालविवाह होणार नाहीत,याची खात्री करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता













Add Comment