स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली यांच्या पथकाची कार्यवाही
मुख्य संपादक: गिरीष देशमुख,वसमत
हिंगोली जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासुन शेतकऱ्यांच्या मोटारपंप चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.या प्रकरणी पोलीस ठाणे आखाडा बाळापूर येथे विविध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदर चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन अशा गुन्ह्यांना आळा घालण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.नीलभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे व त्यांच्या पथकाने घटनास्थळांचा बारकाईने अभ्यास करून गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान मौजे शेवाळा येथील रहिवासी शेख वजीद शेख.अयुब, शेख जिलानी शेख रब्बानी आणि संजय उर्फ न्यायपाल हिरामण नरवाडे यांनी मिळुन मोटारपंप चोरीच्या घटना केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यातील मोटारपंप चोरीचे तीन गुन्हे केल्याची कबुली दिली.
उघडकीस आलेले गुन्हे पुढीलप्रमाणे आहेत :
पोलीस ठाणे आखाडा बाळापूर गुन्हा क्र.२५१/२०२६,कलम ३०३(२)
पोलीस ठाणे आखाडा बाळापूर गुन्हा क्र.२६१/२०२६,कलम ३०३(२)
पोलीस ठाणे आखाडा बाळापूर गुन्हा क्र.२५४/२०२६,कलम ३०३(२)
आरोपींकडून चोरीस गेलेले चार मोटारपंप,८०० फूट केबल आणि एक तीनचाकी ऑटो असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.नीलभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस उपनिरीक्षक माधव जिव्हारे तसेच पोलीस अंमलदार भुजंग कोकेरे,शिवाजी जालमिरे,विशाल खंडागळे,आजम प्यारेवाले,मुनीर प्यारेवाले,हरीभाऊ गुंजकर,ज्ञानेश्वर गोरे व शंकर हराळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यातील मोटारपंप चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.














Add Comment